Tuesday 31 December 2019

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक पदवीधर मतदारांची अंतिम यादी जाहीर


औरंगाबाद दि. 30- (विमाका) :- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची अंतिम यादी  आज जाहीर करण्यात आली आहे.  प्रारुप मतदार यादीतील सुधारणासह यादी  विभागीय आयुक्त कार्यालयाचे https://Aurangabad.gov.in/commissioner-office/ या  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच विभागीय आयुक्त कार्यालय, विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, उप-विभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय येथे दि. 30 डिसेंबर 2019 पासून पाहण्यासाठी उपलब्ध  असल्याचेही विभागीय आयुक्त कार्यालयाने कळविले आहे.
            मतदार नोंदणी नियम 1960 अन्वये महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी पात्र मतदारांची नोंदणी करावयाचा कार्यक्रम  01 ऑक्टोबर 2019 पासून सूरू झाला होता. पूर्वीच्या पदवीधर मतदार संघाच्या यादीमध्ये नाव असले, तरीही संबंधित मतदारांना मतदार नोंदणीसाठी नव्याने अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले होते. पदवीधर मतदार संघांची  निवडणुक जुलै 2020 मध्ये होणार आहेत.

Friday 22 November 2019

केंद्रीय पथकाव्दारे पिक नुकसानीची पाहणी

औरंगाबाद, दि.22 (जिमाका) –राज्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या पावसाने खरीप हंगामातील पिक हातचे गेले. त्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने केले आहेत. त्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यासाठी केंद्रीय कृषी विभागाच्या पाहणी पथकाव्दारे आज 22 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील फुलंब्री, सिल्लोड आणि कन्नड या तालुक्यातील गावांमधील पीक परिस्थितीची पाहणी करण्यात आली.यावेळी पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचा आढावा घेतला.

या पाहणी पथकाचे प्रमुख केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव डॉ. वी. तिरुपगल व त्यांच्यासोबत डॉ. के मनोहरण, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, जिल्हा कृषी अधिक्षक तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे(फुलंब्री) , ब्रिजेश पाटील (सिल्लोड), जनार्दन विधाते (कन्नड) यांच्यासह इतर संबधिंत अधिकारी पाहणी दौऱ्यात उपस्थित होते.

यावेळी फुलंब्री तालुक्यातील चौका येथून नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीस पथकाने सुरवात केली. येथील कांचनबाई नाना वाघ यांच्या दिड एकर शेतातील मका पिकाचे पूर्णत: नुकसान झालेले असून पथक प्रमुखांनी त्या शेतात अजूनही साचून असलेले पाणी, अवकाळी पावसामुळे काढता न आलेला मका याची पाहणी केली. श्रीमती कांचन वाघ यांच्याशी संवाद साधून पथकाने त्यांच्या समस्या , झालेले एकंदरीत नुकसान याबाबत माहिती जाणून घेतली. पुढे पाल गावातील पिकाची पाहणी करुन झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. या गावातील कृष्णा जाधव या शेतकऱ्याने सांगितले की, अवकाळी पावसामुळे एका एकरातील उभे पिक हातचे गेले असून ज्या कपाशीला 50 रु कि. भाव मिळतो तिथे आज नाईलाजाने आम्हाला 10 ते 15 रुपये किलो भावात विकावी लागत आहे. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांवर मोठी आर्थिक अडचण कोसळली आहे,अशा भावना यावेळी शेतकरी जाधव यांनी व्यक्त केल्या. पाथ्री येथील मंदाकीनी पाथ्रीकर यांच्यासह या भागातील शेतीतील कपाशी पिकाचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे यावेळी पथक पाहणीत दिसून आले.

पथकाने सिल्लोड तालुक्याचीही पाहणी केली. तालुक्यातील गेवराई शेमी येथील कडुबा ताठे, माणिकराव ताठे, साहेबराव ताठे, मुरलीधर कापडे, या शेतकऱ्यांशी संवाद साधून पथकाने त्यांचे म्हणणे जाणून घेतले. निल्लोड येथील पांडुरंग आहेर यांच्या मका, सोयाबीन, कापूस,पिकांचे अवेळीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. वंजोळा गावातील विष्णू पंडित या शेतकऱ्याच्या सहा एकर शेतातील मका, कापूस ही दोन्ही पिके शंभर टक्के वाया गेली. मका दुबार पेराही रोग पडल्याने खराब झाल्याचे श्री. पंडित यांनी यावेळी सांगितले. धानोरा गावातील सुभाष बमनावत यांच्या दिड एकरातील दोन लाख खर्च करुन लागवड केलेल्या अद्रक पिकावर रोग पडल्याने संपूर्ण अद्रकीचे पिक खराब झाले असून संपूर्ण गावात हीच परिस्थिती आहे. भराडी गावातील शिवाजी खोमणे या शेतकऱ्याने सांगितले की, 22 दिवस सतत पाऊस झाल्याने दोन एकरातील मका पूर्णत: पाण्यात भिजून खराब झाली ,सडली आणि जनावराने ती खाल्याने ती मृत झाल्याचे यावेळी शेतकऱ्याने सांगितले. या पाहणी दौऱ्यात पुढे पुढे कन्नड तालुक्यातील आडगाव पिशोर येथील गेनुबाई भिवान भोसले यांच्या बत्तीस गुंठे शेतात मका आणि कपाशी होती पण एक महिन्यापासून पाणी साचले आहे. पाणी आटण्यासाठी अजून एक महिना लागणार आहे. शेतातील पूर्ण पिक हातचे गेले असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. नाचनवेल येथील राधाबाई राजपूत यांनी आपल्या दोन एकर शेतातील कापूस पूर्ण वाया गेला असून किमान बि-बियाणांचा आणि खताचा खर्च सरकारने द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तर नाचनवेल शिवारातील कोपरवेल येथील शिवाजी धुमाळ यांनी आपल्या एक एकर मक्याचे पूर्ण नुकसान झाले असून दहा दिवस पाऊस होता आता आम्ही काय करावं, काही सुचत नाही, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

पाहणी दौऱ्यापुर्वी आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी पथकासमोर विभागातील नुकसानीचे सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली.




Sunday 3 November 2019

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शासन पाठीशी - पालकमंत्री एकनाथ शिंदे


नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शासन पाठीशी - पालकमंत्री एकनाथ शिंदे
प्रशासनाच्या संवेदनशिलतेचे उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक
औरंगाबाद, दिनांक 3 (जिमाका) – संपूर्ण मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे खरीप पीकांचे संपुर्णत: नुकसान झाले असून खराब झालेले पीक जनावरांना चारा म्हणूनही उपयोगाचे राहीले नाही. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वोतापरी मदत करणार असुन शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासित केले. नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावरून परतल्यानंतर ते बोलत होते.
अतिवृष्टीमुळे संपूर्ण मराठवाड्यात खरीप पीकांचे नुकसान झाल्याबाबतची आढावा बैठक सुभेदारी विश्रामगृह येथे आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षिरसागर, खासदार अनिल देसाई, व जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, उपायुक्त पराग सोमण आणि महसुल विभागातील संबंधित अधिकारी यांची उपस्थिती होती.

प्रशासनाच्या संवेदनशिलतेचे उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक
यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाच्या अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून पंचनामे व इतर मदत करण्याच्या प्रशासनाच्या तत्परतेबाबत कौतुक केले. तसेच शेतकऱ्यांच्या भावनांबाबत संवेदनशीलता दाखविल्याबाबत प्रशासनाचे धन्यवाद दिले. तसेच शासन आणि प्रशासन मिळून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहु, तसेच स्थानिक पातळीवर प्रशासनाशी आमचे कार्यकर्ते आवश्यक तिथे समन्वयाने कार्य करतील असे पक्ष प्रमुख म्हणुन आपण
येथे सांगत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी श्री. केंद्रेकर यांनी विभागात अवेळी पावसामुळे एकुण 421 महसूल मंडळांपैकी 141 मंडळात 65 मि.मि. पेक्षा जास्त पाऊस झाल्याचे व काही मंडळात अतिवृष्टी नसतांना काढणीसाठी तयार झालेली पीके यामध्ये मका, बाजरी, सोयाबीन, कापूस, ज्वारी अवेळी पावसामुळे खराब झाल्याने जनावरांनाही खाण्यालायक नसल्याने प्रत्यक्ष पाहणीव्दारे स्पष्ट झाल्याची माहिती दिली. त्याचबरोबर सर्व जिल्हाधिकाऱ्यांनाही शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा प्रत्यक्ष गावात जाऊन करण्याच्या सूचना केल्या आहेत. 20 टक्के बाधीत क्षेत्राचे पंचनामे पुर्ण करण्यात आले आहेत. तसेच सन 2019 पिक विमा योजनेअंतर्गत नुकसानी संबंधित 716041 इतके अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती दिली. पीकविमा असो किंवा नसो सरसकट सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या व त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याचेही श्री. केंद्रेकर यांनी यावेळी  सांगितले.


कानडगाव, गारजमध्ये पीक नुकसानीची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी


कानडगाव, गारजमध्ये पीक नुकसानीची
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी
रोहयो मंत्री क्षीरसागर,खोतकर यांचीही उपस्थिती
औरंगाबाद, दिनांक 3 (जिमाका) - कन्नड तालुक्यातील कानडगाव,   वैजापूर तालुक्यातील गारजमध्ये गावातील शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, आमदार संदिपान भुमरे, आमदार उदयसिंह राजपूत, आमदार रमेश बोरणारे, आमदार अब्दुल सत्तार, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदी उपस्थित होते.
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या सर्व पिकांचे नुकसान झाले. शासनाने पिकांची नुकसान भरपाई त्वरित द्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी यावेळी श्री. शिंदे यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केली. कानडगाव येथे मोगल कुटुंबीय व गारज येथे लालचंद राजपूत यांच्या शेतात श्री. उद्धव ठाकरे यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधला, तसेच परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांना धीर दिला. या परिसरातील शेतकरी काशीनाथ जाधव, अशोक गाडेकर, प्रभाकर जाधव यांनी शासनाने आम्हाला लवकर मदत द्यावी, अशी मागणी केली.




Saturday 2 November 2019

शेतकऱ्यांच्या हितालाच सर्वोच्च प्राधान्य - पालकमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांच्या हितालाच सर्वोच्च प्राधान्य- पालकमंत्री एकनाथ शिंदे
  पालकमंत्र्यांनी केली शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी
औरंगाबाद, दिनांक 2(जिमाका)परतीच्या  पावसाने  शेतकऱ्यांच्या  पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.  प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंगापूर, कन्नड आणि खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.शासन शेतकऱ्यांच्या हितालाच प्राधान्य देईल असेही ते म्हणाले.
गंगापूर तालुक्यातील सिध्दनाथ वडगाव येथे दिलीप बैनाडे, संजय बैनाडे यांच्या मका आणि कापूस पिकांच्या नुकसानीची त्यांच्या शेताच्याबांधावर जाऊन श्री. शिंदे यांनी पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक विमा कंपनी, कृषी विभाग यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकरी निहाय नुकसान भरपाई देण्यात यावी, यासाठी शासन सकारात्मक आहे. नुकसान भरपाई ही प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे. मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, अशी ग्वाही देखील श्री. शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली.
                सिध्दनाथ वडगाव येथे बैनाडे बंधुंच्या बांधावर खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरनारे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोनगावकर, माजी खासदार चंद्रकांत दानवे आदींची उपस्थिती होती.
पळसवाडीत पाहणी
खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे देविदास देवरे यांच्या शेतात झालेल्या मका पिकाच्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री श्री. शिंदे यांनी केली. पाहणी दरम्यान येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकरी हा देशाचा कणा आहे. शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले. परंतु शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन तुमच्या खंबीरपणे पाठिशी असल्याचे यावेळी शेतकऱ्यांना सांगितले. तसेच शेतकऱ्याच्या हितासाठी आवश्यक ते सर्व काही करू, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांचे सोबत खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोनगावकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती होती.
करंजखेड्यात शेतकऱ्यांना दिलासा
कन्नड तालुक्यातील करंजखेडा येथे विठ्ठल सोळंके, सुधाकर ताजने यांच्यासह येथील अन्य शेतकऱ्यांशी त्यांच्या शेताच्या बांधावर पालकमंत्री श्री. शिंदे यांनी संवाद साधला.परतीच्या पावसाने झालेले शेतकऱ्यांचे नुकसान शेतकऱ्यावरील संकट आहे. ते दूर करण्यासाठी शासन त्यांच्या खंबीरपणे पाठिशी उभे असल्याचा विश्वास शेतकऱ्यांना पालकमंत्री श्री. शिंदे यांनी दिला. तसेच प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांचे वेळेत पंचनामे करावेत,अशा सूचनाही केल्या.यावेळी त्यांच्या समवेत खासदार अनिल देसाई,  कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते.
भराडीला भेट
सिल्लोड तालुक्यातील भराडी येथेही पालकमंत्री शिंदे यांनी  बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी खा. अनिल देसाई आमदार अब्दुल सत्तार,जिल्हापरिषद् अध्यक्ष देवयानी डोणगावकर,माजी खासदार चंद्रकांत खैरे,बाबूलाल राजपूत अणि इतर उपस्थित होते .
.